केडगाव प्रभाग १६ : स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी निर्णायक लढाई – अपक्ष उमेदवारांचे मतदारांना आवाहन

केडगाव प्रभाग १६ : स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी निर्णायक लढाई – अपक्ष उमेदवारांचे मतदारांना आवाहन
अहिल्यानगर – केडगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणूक ही केवळ सत्तेची नसून केडगावकरांच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचे ठाम मत अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांनी केडगावकरांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे व विमल कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी बोलताना अपक्ष उमेदवारांनी स्पष्ट केले की, प्रभाग १६ मधील नागरी सुविधा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्या असून, रस्ते, पाणी, स्वच्छता व मूलभूत सोयीसुविधांचा गंभीर प्रश्न आजही नागरिकांना भेडसावत आहे. या सर्व प्रश्नांची जबाबदारी स्वीकारून आपण त्या सुविधा भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः पाणी प्रश्न हा केडगावसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर मुद्दा असून, या प्रश्नावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केडगावचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केडगावकरांचा दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांची तहान भागवली गेली आहे, असे अपक्ष उमेदवारांनी सांगितले.
याच यशाच्या पुढील टप्प्यात आता २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला. केडगावचा विकास केवळ घोषणांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कामातून दाखवण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, प्रभाग १६ मधील ही निवडणूक केडगावच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार असून, स्थानिक नेतृत्व आणि केडगावकरांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवारांनाच संधी द्यावी, असे मत नागरिकांमध्येही व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *